मुंबई,दि. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना प्रकरणावरून भाजपा नेते मंगलप्रभात लोढांनी (Mangal Prabhat Lodha) स्पष्टीकरण दिले आहे. शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याचे चिन्हं दिसत आहेत.
राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात आली आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “विरोधक काय बोलतील, त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झालं नाही, जे टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितलं हे त्यांनी बघितलं असेल का? त्यांनी नाही बघितलं. मी फक्त उदाहरण दिलं होतं. कधीही तुलना केली नाही करू शकत नाही. कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.
याशिवाय “मी कधी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मी कधी राजकारणात जात नाही, मी असं समजतो की सरकारचं काम सकारात्मकतेने करायचं आहे. महाराष्ट्रात फार काही समस्या आहेत. जे काही माझ्याकडे दोन-तीन विभाग आहेत, त्यामध्ये मी काय करू शकतो, त्याच्या मी प्रयत्नात असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झालं ते आता बंद केलं पाहिजे.”
याचबरोबर “आरोप करणे हा लोकशाहीत विरोधी पक्षाचा अधिकार आहे, सर्वांचाच अधिकार आहे आणि आम्ही त्याचं उत्तरही दिलं पाहिजे, यासाठीच तुमच्या समोर आलो आहे. मी तुलना केली नाही, मी उदाहरण दिलं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण प्रत्येक मुलाला दिलं जातं. त्याच्या जन्मापासून त्याला शिकवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? मग तेव्हा त्यामध्ये काय त्यांची तुलना केली जाते का? याविषयी ज्याप्रकारे राजकारण केलं जातय ते राजकारण व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज चमकणारा सूर्य होते, त्यांची त्याच स्थानवर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आणणं बंद झालं पाहिजे.” असंही यावेळी लोढा म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली. “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं विधान लोढा यांनी केलं आहे.