औरंगाबाद,दि.9: महाराष्ट्रात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एकीकडे शिवसेनेमध्ये मोठा भूकंप आला आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवले गेले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे एकाच गाडीतून प्रवास करताना आढळून आले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा त्यांच्यासोबत आहे. औरंगाबादमध्ये शरद पवार पोहोचले असता शहरात रावसाहेब दानवे यांची भेट झाली. त्यानंतर शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीने प्रवास केला. राष्ट्रवादीवर एकदाही टीकेची संधी न सोडणारे रावसाहेब दानवे आणि शरद पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचे पाहून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. या घटनेवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शिवसेना अजिबात संपणार नाही, ती आणखी जोमाने वाढणार आहे. शिवसेनेमध्ये जी तरुणपिढी आहे, ती आणखी जोमाने काम करणारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
‘निवडणुकामध्ये जर जायचे असेल तर आणि एखादी संघटना असेल. त्यावेळी चिन्ह असेल किंवा नसेल तरीही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली पाहिजे’ असा सल्लाही शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला.