दि.२५: तुम्ही ब्राम्हण किंवा पंडित असाल तर बलात्काराचा गुन्हा असला तरी तुमची सुटका केली जाईल असं संविधानामध्ये लिहिलेले आहे का?असे म्हणत निर्भयाची आई आशा देवी यांनी बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना मुक्त करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी असं मत आशा देवी यांनी व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आल्याच्या मुद्द्द्यावरुन कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
२०१३ मध्ये दिल्लीमधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरामध्ये आंदोलनं झाली होती. याच प्रकरणातील पीडिताचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासूनच या तरुणीची आई आशा देवी या बलात्कार पीडित महिलांना न्याय मिळायला हवा अशी भूमिका वेळोवेळी मांडताना दिसल्या आहेत. अशीच भूमिका त्यांनी बिल्किस बानो प्रकरणामध्येही घेतली असून गुजरात सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने या ११ आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी बिल्किस बानो प्रकरणामध्ये मुक्तता करण्यात आली. बिल्किस बानोवर सामुहिक बलात्कार करुन तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याप्रकरणी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या आरोपींनी हत्या केलेल्या व्यक्तींमध्ये बिल्किस यांच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता.
“बलात्कार प्रकरणातील आरोपींची कधीच मुक्तता केली जाऊ नये असं मला वाटतं. जर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असेल तर त्यांना आयुष्यभर तुरुंगात ठेवलं पाहिजे. कारण हा प्रकार फक्त त्या प्रकरणाशी किंवा कुटुंबाशी संबंधित नसतो तर हा महिलांच्या सुरक्षेशीसंबंधित प्रश्न ठरतो. अशा गुन्ह्यांमधील आरोपींची मुकत्ता केली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जातो,” असं आशा देवी यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
ग्रामीण भागांमधील लाखो महिला या बलात्कार प्रकरणांमध्ये न्याय मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत. गावातील कुटुंबांना आणि पालकांना मुलींना बाहेर पाठवण्यास भिती वाटत आहे. त्यामुळेच बलात्काऱ्यांची मुक्तता केली जाऊ नये, असं आशा देवी यांनी आपलं म्हणणं मांडताना म्हटल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
आशा देवी यांनी बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचं हार घालून, मिठाई खाऊ घालून स्वागत करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुनही नाराजी व्यक्त केली आहे. अशापद्धतीने आरोपींचं स्वागत करणं हा बिल्किसची थट्टा करण्यासारखं आहे. तसेच हा सर्व प्रकार म्हणजे बलात्कार पिडितांची थट्टा केल्याप्रमाणेच असल्याचा आरोप आशा देवी यांनी केला आहे. गुजरात सरकारने त्यांच्या या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे, असं मत आशा देवी यांनी मांडलं आहे.
आरोपींचं हार घालून स्वागत करणं हे फारच दुर्दैवी असल्याचं म्हणत आशा देवी यांनी पुरुष असला की त्याने कोणताही गुन्हा केला तरी तो निर्दोष असतो असा संदेश यातून जात असल्याचं म्हणत खंत व्यक्त केली आहे. “ज्यांची विचारसरणी बलात्काऱ्यांप्रमाणे आहे त्यांना या साऱ्या घटनांमधून चुकीचा संदेश जात आहे. अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचं झालं तर त्यांनी बलात्काऱ्यांना पाठिंबा दिला आहे, असं म्हणता येईल,” अशी भूमिका आशा देवी यांनी मांडली.
भाजपाचे आमदार सी. के. राऊलजी यांनी बिल्किस प्रकरणातील आरोपी हे ब्राम्हण असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत या विधानाचाही आशा देवी यांनी समाचार घेतला आहे. जर त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत तर त्यांनी महिलेवर बलात्कार का केला? असा प्रश्न आशा देवी यांनी उपस्थित केला आहे. “तुम्ही ब्राम्हण किंवा पंडित असाल तर बलात्काराचा गुन्हा असला तरी तुमची सुटका केली जाईल असं संविधानामध्ये लिहिलेले आहे का?” असा संतप्त सवाल आशा देवी यांनी भाजपा आमदाराच्या विधानावर बोलताना उपस्थित केला आहे. “हे विधान फार चुकीचं आहे. तुम्ही कोणीही असलात तरी तुम्हाला शिक्षा केली जाईल,” असं आशा देवी यांनी म्हटलं आहे.
आशा देवी यांनी बल्किस बानो प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आल्याचं वृत्त ऐकल्यानंतर आपल्याला फार दु:ख झाल्याचंही म्हटलं आहे. बिल्किस बानोच्या कुटुंबियांनी या मुक्ततेच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी असा सल्लाही आशा देवी यांनी दिलं आहे. “अशापद्धतीने आरोपींची मुक्तता करणं हे समाजाच्या हिताचं नाही,” असंही त्या म्हणाल्या आहेत.