मुंबई,दि.2: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपाबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. न्यायालयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेने भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करत विरोधकांना संपवण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप केला आहे. संजय राऊत हे भाजपाच्याविरुद्ध सातत्याने भूमिका मांडत होते. ईडीची भीती दाखवत भाजपाने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणल्याचाही आरोप होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर गेलेल्या अनेकांची ईडी चौकशी सुरू होती.
ईडीने संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले. खासदार जया बच्चन यांनीही ईडीच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांकडून ईडीच्या कारवाईविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, भाजप नेते या कारवाईचं समर्थन करताना दिसून येत आहेत. आता, भाजपचे सहकारी पक्ष असलेल्या केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही ED कारवाईचे समर्थन केलं आहे. तसेच, याचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली. मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना अटक केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली. यानंतर आता राऊत यांच्या अटकेवर विविध क्षेत्रातील लोकांनी प्रतिक्रिया दिली. त्यात, राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया देताना कारवाईचं समर्थन केलं आहे.
ईडी एक स्वतंत्र विभाग आहे. जर कुठे भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहारात अनियमितता आढळून आल्यास ईडीकडून तपास करण्यात येतो. या कारवाईमागे भाजपचा काहीही संबंध नाही, भाजपा कुणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही, असे मत रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
राऊत यांच्या अटकेनंतर जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. फक्त 11 लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे असं म्हणत 2024 पर्यंत हे सर्व सुरू राहील, असं जया बच्चन यांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणाला भाजपाच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणावर दिग्दर्शक अशोक पंडित आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.