ठाणे,दि.६: वारकऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत आढावा बैठक घेतली. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
खड्डे लक्षपूर्वक भरा, खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये, याची प्रामुख्याने दक्षता घ्या, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचे निर्देश दिले. तसेच अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन झाले आहे. पंढरपूर वारकरी समितीकडून वारकऱ्यांसाठी उत्तर सोय करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्यापेक्षा वारकऱ्यांच्या सुरक्षितेकडे जास्त लक्ष द्या, असं एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना म्हणाले. मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.