मुंबई,दि.20: काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा असे भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्विट केले आहे. राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.
निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे सर्वच पक्षांकूडन खास खबरदारी घेतली जात आहे. काहीही झालं तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जातोय. तर दुसरीकडे निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे थेट नाव न घेता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याबद्दल भाकित केलं आहे.
“काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,” असं सूचक ट्वीट अनिल बोंडे यांनी केले आहे. बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला असून अनेकजण आपापल्या पातळीवर बोंडे यांच्या ट्वीटचा अर्थ लावत आहेत.
राज्यसभेपेक्षा १० पट जास्त परिस्थिती विधान परिषदेच्या निकालात दिसेल- चंद्रशेखर बावनकुळे
“राज्यात सरकार कसं चाललंय हे सर्व आमदार पाहात आहेत. भाजपाचं सरकार होतं त्यावेळी आमदारांना व्यवस्थित निधी मिळत होता. पण आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत याचा विश्वास आम्हाला आहे. राज्यसभेपेक्षा १० पटीनं जास्त परिस्थिती आजच्या निकालात तुम्हाला पाहायला मिळेल”, असं भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत