मुंबई,दि.२१: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत ब्राम्हण समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्ष ब्राम्हण विरोधी असल्याचा दावा केला जात असतो, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे. मात्र शरद पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारलं आहे.
राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ब्राह्मण महासंघाने मात्र या बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देण्यासंदर्भात भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी काही कारणं असल्याचं म्हटलंय आहे.
शरद पवारांना कल्पना
“शनिवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलवले आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण पवारांना सांगावं. मात्र पवारांना आमच्या नाराजीची पूर्ण कल्पना आहे,” असं दवे यांनी म्हटलंय.
केतकी चितळे प्रकरण
“केतकी चितळे पूर्णतः चुकली. पण आपण सुद्धा तिच्यावर टिकाच केली. पवारांनी केतकीला माफ करून जर गुन्हे मागे घेण्यास सांगितलं असत तरं ते खूप मोठे झाले असते,” असंही दवे यांनी म्हटलंय. “केतकीवर २८ ठिकाणी गुन्हे दाखल केलेल्या पोलिसांनी मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही,” असंही दवे म्हणालेत.
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका
“तुमच्या आंदोलननंतर राज्यभर समाज जागा झाला. पण तरीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. (दिवंगत माणसावर टीका करत नाहीत शक्यतो कोणीच.) काही संस्था निश्चितच या बैठकीला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. इतरांनी काय करावे हे आपण कधीच सांगत नाही,” असंही दवे म्हणाले. “आपली भूमिका ठरवण्याआधी मी स्वतः सर्व विश्वस्त, कार्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांची पण मते जाणून घेतली. आज प्रवासात सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली त्यांना सुद्धा हेच पटत आहे,” असंही दवे म्हणाले.