मोहोळ,दि.१०ः खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या ३ लहान मुलांचा शेततळ्यात पाय घसरून पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही दुर्देवी घटना शेटफळ येथे सोमवारी (दि.९) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.
विनायक भरत निकम (वय १२), सिध्दार्थ भरत निकम (वय ८ दोघे राहणार माचणूर) तर कार्तिक मुकुंद हिंगमिरे (वय ५, रा. शेटफळ) अशी मृत्यू झालेल्या लहान मुलांची नावे आहेत.
माचणुर (ता.मंगळवेढा) येथील निकम कुटुंब हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याचा शेतात सालाने कामाला आहेत. तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब आहे, सोमवारी डोंगरे यांच्या शेतामध्ये डाळिंब तोडणीचे काम सुरू होते दरम्यान कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम हे तिन्ही बालके शेततळ्याच्या शेजारी खेळत होती, ते बराच वेळ दिसली नाहीत, त्यांचा शोध घेतला असता शेततळ्यात पडल्याचे दिसून आले.
त्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. हि घटना पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मराठी गावात असेच तीन बालकांचा खेळत खेळत शेततळ्यामध्ये पडून मृत्यू झाला होता.