होय मी कंत्राटदार मुख्यमंत्री दाऊदचा हस्तक नाही: एकनाथ शिंदे

0

नवी दिल्ली,दि.22: होय मी कंत्राटदार मुख्यमंत्री दाऊदचा हस्तक नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. शिवसेनेच्या देशातील 13 राज्यांमधील राज्यप्रमुखांची सभा बुधवारी दिल्लीत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड शब्दात उत्तरे दिली. शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट यांच्या विचारांवर आणि शिवसैनिकांच्या रक्तातून उभा राहिलेला झालेला पक्ष आहे. हा कुणा एका कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्ला चढविला.

बाळासाहेबांचे विचारांची जोपासणा करण्यासाठी आपण वेगळे  झाल्याचे सांगून ते म्हणाले, बाळासाहेबांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचे महापाप कधीही केले नाही. हे महापाप आता झाले आहे. हा हिंदुत्वाचा निखारा विझू नये, यासाठी आम्ही वेगळे झालो आहे. सत्तेसाठी वेगळे झालो नाही. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. ही प्रतारणा कुठेतरी मला व माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना खुपत होती. परंतु मनातील ही बाब शिवसैनिकांची ऐकून घेतली जात नव्हती. ते सर्वजण माझ्याकडे येत होते. माझ्याकडे दु:ख सांगत होते. त्यामुळे हा निर्णय घेतला. सत्तेसाठी हा निर्णय घेतला नाही. सत्ता असलेल्या  लोकांनी मंत्रिपदाच्या खुर्चीवर लाथ मारून माझ्यासोबत आले आहेत. हे विचारांशी बांधिलकी होती म्हणून झाले आहे.

होय, कंत्राटदार मुख्यमंत्री

माझ्यावर कंत्राटदार मुख्यमंत्री असल्याचा आरोप केला जात आहे. होय, मी बेरोजगारांना रोजगार देण्याचे कंत्राट घेतले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कंत्राट घेतले आहे. वृद्धांना मदत करण्याचे कंत्राट घेतले आहे. यासाठी मला कुणी कंत्राटदार म्हणत असतील तर ते माझ्यासाठी भूषणावह आहे.

दाऊदचा हस्तक नाही

माझ्यावर मोदी व शहाचा हस्तक असल्याचा आरोप केला जातो. परंतु मी आयुष्यात दाऊदचा हस्तक राहिलो नाही. मी राममंदिर बांधणाऱ्यांना सहकार्य केले आहे, असेही ते म्हणाले. 

कुंडली माझ्याकडे

खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी सांगायला सुरूवात केली तर तुम्ही कुठे राहणार आहे. पब्लिक है सब जानती है, असे म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर हल्ला चढविला.

विचार, पक्ष विकणारी टोळी?

उद्धव ठाकरे यांनी बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय, असा घणाघात केला होता. याबाबत शिंदे म्हणाले, आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येत आहे. शिवसैनिकांवर विश्वास नाही, म्हणून प्रतिज्ञापत्र घेतले जात आहेत. अडीच वर्षांनी गटप्रमुखांना अच्छे दिन आले, असा टोलाही टोला त्यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here