राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाऊन विचारणार जाब
मुंबई,दि.११: राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या प्रकरणांत ईडीने काय कारवाई केली आहे, याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार आहे. याबाबत पक्षाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काही नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणांची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली आहे. ही संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीकडे देणार आहेत, असे मलिक यांनी नमूद केले. लवकरच ईडी कार्यालयात जाऊन भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, हे तपास का थांबले आहेत, याची विचारणा आम्ही करणार आहोत व त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत त्या गतिमान करा, असे आवाहनही ईडी अधिकाऱ्यांना केले जाणार आहे, असे मलिक म्हणाले. सत्तेचा गैरवापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील लोकांवर कारवाई केली जातेय. मात्र भाजपमधील लोकांवर ईडीचे गुन्हे दाखल होऊनही कारवाई होत नाही. याचा जाब आमचे शिष्टमंडळ विचारणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.