महाराष्ट्रात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा

0

मुंबई, दि.१८ : वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान व अथक प्रयत्नांना यश आले असून मागील पाच दिवसात राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच गेल्या पाच दिवसांपासून कृषिपंपांना दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे विविध स्त्रोंताकडून अतिरिक्त स्वरूपात पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करण्यात आली आहे. त्याची फलश्रुती म्हणून गेल्या पाच दिवसांपासून विजेच्या उच्चांकी मागणीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वीज वाहिनीवर भारनियमन करण्यात आले नाही.

राज्यातील विजेचे तात्पुरते भारनियमन कोणत्याही परिस्थितीत टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याची सूचना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. त्यामुळे अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध होत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे वीज परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महावितरणने भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश आले आहे. कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वीज पुरवठ्याची हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here