मुंबई,दि.८: Uddhav Thackeray PC: राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धनुष्यबाण चिन्हा बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, एक चर्चा सुरु आहे शिवसनेच्या चिन्हाबद्द्ल. कायद्याच्या दृष्टीने बघतिलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दामून तुम्हाला सांगत आहे.
ठाकरे कुटुंबियांवर-मातोश्रीवर टीका करणाऱ्या बरोबर —
उद्धव ठाकरे म्हणाले, “आता काही जण बोलत आहांत कि सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर जाऊ. या लोकांना मातोश्रीवर प्रेम आहे याबद्दल त्यांचे आभार मानतो, धन्य झालो. मात्र जेव्हा आमच्यावर- ठाकरे कुटुंबियांवर-मातोश्रीवर टीका करत होते, विकृत टीका करत होते तेव्हा याच लोकांची दातखिळ बसली होती. आता टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हीच लोकं बसले आहेत तेव्हा हे प्रेम खरे की खोटे आहे ? शिवसेनेने एवढी पदे दिल्यावर असे का वागले हा प्रश्न आहे.”
पक्ष जाऊ शकत नाही – उद्धव ठाकरे
एक आमदार गेला म्हणून पक्ष संपला का ? आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही. हा एक संभ्रम तयार केला जात आहे म्हणून लोकांना सांगत आहे यावर विश्वास ठेवू नका. विधीमंडळ पक्ष वेगळा आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा. धनुष्यबाण बाबत कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. ते १५-१६ आमदार विधीमंडळात आमच्याबरोबर राहीले आहे त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसे जिथे असतात तिथे विजय हमखास असतो. माझा न्याय मंदिरावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकशाहीचे अस्तित्व किती मजबूत रहाणार आहे, देशाच्या पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा उद्याचा निकाल असणार आहे.
विधानसभा निवडणुका झाल्या पाहिजेच – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज केलं तेच अडीच वर्षापूर्वी झालं असतं ते आता घातपाताने का केलं, जी गोष्ट सन्मानाने केली असती ती खर्च करुन आता का करत आहांत ? विधानसभेची निवडणुक घ्या.निवडणुक झाली पाहिजे. आम्ही जर चुकलो असू तर जनता जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सन्मानाने बोलवावं असं यापूर्वीही आवाहन केलं आहे. जर त्यांना मिठी मारुन आनंद मिळत असेल तर तो आनंद तुम्हाला लखलाभ लाभो.”
पक्ष संपत नसतो
“शिवसेना काही अशी गोष्ट नाहीये की कुणीतरी घेऊन पळत सुटला. कुणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही. विधिमंडळ पक्ष किंवा रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असतो. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी निवडून जात असतात. समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“हा संभ्रम निर्माण केला जात आहे. मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या भ्रमामध्ये अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. त्यात असंख्य मतदार, पदाधिकारी, सदस्य असतात. त्या पदाधिकाऱ्यांना हे असंच उचलून कुणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांना पैशांच्या दमदाटीवर कुणी घेऊन जाऊ शकत नाही. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहील”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदारांचं कौतुक
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत शिवसेनेत राहिलेल्या १५ आमदारांचं कौतुक केलं आहे. “विधिमंडळात जे आमदार माझ्यासोबत राहिले, त्यांचं मला जाहीर कौतुक करायचंय. त्यांनाही आमिषं दाखवण्यात आली, धमक्याही देण्यात आली. तरी काहीही झालं तरी आम्ही हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.