मुंबई,दि.२९: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. (CM Uddhav Thackeray Resign) मी सांगतो, उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमधे येऊ नये. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे पोलीस दल, इतर फोर्स, इतर देशातून सैन्य आणणार असतील, तर आणू द्या. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तुमची नाराजी सूरतला किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षावर किंवा मातोश्रीवर येऊन सांगितलं असतं, तर बोललो असतो मी. काय आहे ते समोर येऊन बोला. आजही मी तुमच्याशी आदरानं बोलतो आहे. शिवसैनिकांनी तुम्हाला एकदा आपलं मानलं होतं. तुमच्याशी वाद-लढाया काय करायच्या? असेही उध्दव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray Resign)
हे लोकशाहीचं दुर्दैव आहे की इथे डोक्याचा वापर फक्त मोजण्याच होतो की कुणाकडे किती बहुमत आहे. माझ्या विरोधात किती आहेत, यात मला रस नाही. पण एक जरी माझा माणूस उभा राहिला तर ते मला लज्जास्पद आहे. मला बहुमताचा खेळच खेळायचा नाहीये. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्यांना शिवसेनेनं राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात पडत असेल तर ते पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे. त्याची फळं अशी भोगावी लागत असतील, तर त्यात त्यांचा काय दोष आहे. उद्या ते अभिमानानं सांगतील की बघा आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचलं की नाही. असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.
“ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीने सोबत आहे, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसेना,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना भवनावर येणाऱ्या समर्थकांचे आभार मानले. “राज्यपाल महोदयांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी लोकशहीचा मान राखलात, एक कॉपी दिल्यावर २४ तासात आदेश दिला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये राज्यपालांचे आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असंही म्हटलं.
“काँग्रेस बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार होती, अशोक चव्हाण मंत्रीमंडळ बैठकीनंतर म्हणाले की आम्ही बाहेर पडतो, पण त्यांना सांगा असं वेड्यासारखं वागू नका,” असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायची की कामासाठी?, असा प्रश्न विचारत आपल्याला डोकी मोजण्याची इच्छा नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. “मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रमाणिकपणे असं वाटतं की शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आज न्यायदेवतेनं निकाल दिलाय
आज न्यायदेवतेनं निकाल दिलाय. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा जो आदेश दिला आहे, त्याचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. लोकशाहीचा मान राखल्याबद्दल धन्यवाद देतो. काही जणांनी पत्र दिल्यावर लगेच आदेश दिले. विधान परिषदेच्या सदस्याची यादी मंजूर केली तर आदर वाढेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.