एकमेकांवर चिखलफेक करत जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न होतोय: राजू शेट्टी

0

तुळजापूर,दि.१९: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्य सरकार व भाजपावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मिळून काम करत आहेत. जनतेचे प्रश्न बाजूला सारून ते वेगळ्याच मुद्दा काढून एकमेकांवर चिखलफेक करत आहे. तेरी भी चूप, मेरी भी चूप असं चाललं असल्याचा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

तुळजापूर येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज हुंकार यात्रेला सुरवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत माजी खासदार राजु शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्यपालांवर टीका केली. भारतीय लोक हे १०० टक्के धार्मिक आहेत. वेगवेगळ्या धर्माचे आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी आहेत. सर्वजण आपल्या धर्माचं पालन करतात. यासाठी जाहीर धार्मिक प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. हे भोंग्या बिंग्याचं बाजूला ठेवा. इथं दिवसा वीज नसते. त्याकडे बघा. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही, ते बघा. जनता हैराण आहे. आधी महागाईचं बोला. एका बाजूला एसटीचा संप आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने खासगी वाहनं वापरता येत नाही, त्यावर बोला. प्रत्येकाच्या घरात देवघर आहे. तिथे तास तास देवपूजा आणि तुमची देवाची भक्ती करा, असं म्हणत राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

काळे कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले. या कायद्यांनी ८०० शेतकऱ्यांचा बळी घेतला. यामुळे आपण काळे कायदे आणणाऱ्यांसोबत जाणार नाही, असं म्हणत शेट्टी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांच्यासोबत का जायचं? अजूनही काही शेतकऱ्यांचा बळी घ्यावा म्हणून, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात निश्चितच टोलवा टोलवी सुरू आहे. कोळशाची कुठलीही टंचाई नाही. खासगी उद्योजकांना कोळसा भेटतो. मग राज्य सरकारला कोळसा कसा भेटत नाही? असा सवाल करत राजू शेट्टींनी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला केला. गेल्या महिन्यात ऊर्जामंत्री म्हणतात तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. आणि कोळसा टंचाईच्या नावाखाली खुल्या बाजारातून २० ते २१ रुपये युनिट दराने वीज खरेदी केली जात आहे. कुणाचे तरी खिशे भरण्यासाठी आणि कुणाचा तरी फायदा होण्यासाठी कोळसा टंचाईचा नटक केलं जात आहे की काय? अशी शंका यामुळे निर्माण होत असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here