आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
दि.१७:महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजाराच्या खाली आली असून मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. मुख्य म्हणजे निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आल्यानंतरही रुग्णसंख्या कमी होत असल्याने हा राज्यासाठी खूप मोठा दिलासा ठरला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवाळीत कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणाऱ्या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मंदिरं, थिएटर्स उघडली आहेत. आता यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी वाढते या सर्व पार्श्वभूमिवर निर्णय होईल, असं ते म्हणाले. संख्या आटोक्यात राहिली तर सवलत मिळेल, असं ते म्हणाले. आरोग्य सेतू अॅपमध्ये जर ‘सेफ’ असं स्टेटस आल्यास सवलती मिळू शकतील. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारीनंतर आरोग्य विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.