मनसेने औरंगजेबाच्या कबरी बाबत केली ही मागणी

0

दि.१७: एम आय एम चे अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. यावरून राज्यात गदारोळ माजला होता. अनेकांनी याचा निषेध केला होता. या प्रकरणावरुन सत्ताधारी शिवसेनेपासून ते विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान असं असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेनं केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा संदर्भ देत हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. “१८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, “संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झालं पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.” शिवसेनेचं हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का? हे थडगं जमीनदोस्त होणार आहे का?” असे प्रश्न मनसेनं उपस्थित केलेत.

“या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद इथं येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केलाय.

शिवसेनेवर निशाणा साधताना अनेक गोष्टींवरुन शिवसेनेनं पलटी मारल्याचा टोला लगावत बाळासाहेबांचं हे म्हणणं तरी ऐकणार का अशी विचारणाही मनसेनं केलीय. “आपण संभाजी नगरच्या नामकरणावरुन पलटी मारलेली आहे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावरील नमाज, भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन पलटी मारलेली आहे. किमान बाळासाहेबांचं हे ऐकून या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे थडगं आपण तोडून टाकणार आहात?, हा आमचा नेमका सवाल आहे. असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा असं आम्ही आव्हान करतो,” असंही काळे यांनी म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here