मुंबई,दि.६: राज्यातील शाळा नियोजनानुसार सुरू होतील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्याने १३ जूनपासून शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शंका उपस्थित होत असताना योग्य काळजी घेऊन नियोजनानुसारच शाळा सुरू करण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
राज्यात १३ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. यावर, शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे सांगत योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जातील, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या निश्चितच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
दोन वर्षांमध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता दुसरीत असलेली मुले तर पहिल्यांदाच शाळेत येतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे योग्य काळजी घेत शाळा सुरू करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
टास्क फोर्सशी चर्चा
शाळांमध्ये मास्क सक्ती करायची का, याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. त्यानंतर आवश्यक मार्गदर्शक सूचना (एसओपी) जाहीर करू.
सध्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. सध्या कोणतेही निर्बंध अथवा सक्ती नाही. त्यामुळे शाळांच्या बाबतीत टास्क फोर्सशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.