दि.19: ओडिशात बिजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास स्वतःच्या लग्नाच्या नोंदणीसाठी रजिस्टर कार्यालयात यायला विसरले. महिनाभरापूर्वी आमदारासह त्यांच्या प्रियसीबरोबर अर्ज केला होता. आता प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वृत्तानुसार, तिरतोल मतदारसंघाचे आमदार विजय शंकर दास यांच्या लग्नाची नोंदणी शुक्रवारी जगतसिंगपूरच्या उपनिबंधक कार्यालयात होणार होती. मैत्रीण सोमालिका वेळेवर कार्यालयात पोहोचली होती, पण आमदार किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही तेथे आले नाही. तब्बल तीन तास वाट पाहिल्यानंतर निराश झालेल्या सोमालिका यांना निबंधक कार्यालयातून बाहेर पडावे लागले.
आश्वासन देऊनही आमदार शुक्रवारी विवाह निबंधक कार्यालयात न आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी आमदार व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध शहराच्या सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सोमलिकाने पोलिस ठाणे गाठत दास आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दास हे तिच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधांत होते. त्यांनी तिच्यासोबत फसवणूक आणि शारीरीक शोषण केल्याचा दावा तिने केला आहे. दास यांनी लग्नाचे आश्वासन दिले होते. परंतू, आता तो तिचे फोन उचलत नाहीय. दास यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय आपल्याला धमकी देत असल्याचा आरोप तिने केला आहे.
17 मे रोजी आम्ही दोघांनी विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करण्यासाठी अर्ज दिला होता. कोर्ट मॅरिज करण्यात येणार होते. परंतू त्यांनी फसविले असा आरोप सोमलिका यांनी केला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांशी फोनवरून झालेल्या संभाषणात विजय शंकर यांनी लग्नाची गोष्ट स्वीकार केली आहे. परंतू, विवाह नोंदणी अर्ज केल्यानंतर 90 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अजून 60 दिवस बाकी आहेत. आज लग्नाच्या नोंदणीबाबत मला कोणाकडूनही माहिती मिळालेली नाही, असे म्हटले आहे.