मुंबई,दि.10: महाराष्ट्रातील वारे आता महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात 40 आमदारांची घरवापसी होईल असेही वडेट्टीवार म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा तर महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आशावादी झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होईल.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर मूळ पक्ष सोडून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी बरेच जण स्वगृही म्हणजेच मूळ पक्षात परततील असा दावा केला आहे. पुढील महिन्याभरामध्ये राज्यात हा मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकित वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर “मूळ पक्ष सोडून गेलेले अजित पवार गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो. पुढच्या महिन्याभरामध्ये या दोघांचे मिळून 40 आमदारांची घरवापसी होईल, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. तशापद्धतीने हे लोक संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. हे होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. महाराष्ट्रातील वारे आता महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहेत,” असं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.