दि.28 : पूर्वीच्या काळी कार म्हटले की फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे असा समज होता. गरिबांच्या दारातही कार असावी असे संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचे स्वप्न होते. प्रत्येक गरिबाला स्वस्तात कार मिळावी असे स्वप्न संजय गांधी यांचे होते. 80 च्या दशकात फक्त श्रीमंतांकडेच कार होती. त्या काळी मारुती सुझुकीनं वाजवी दरातलं मॉडेल बाजारात आणलं आणि सर्वसामान्य माणसाचं स्वप्न साकार होण्यास एकप्रकारे मदतच केली. ती कार होती मारुती 800.
80च्या दशकात मारुती सुझुकीच्या गाड्यांचा मोठा बोलबाला होता. आजही जेव्हा मारुती सुझुकीच्या देशातील एकूण वाटचालीविषयी चर्चा होते तेव्हा हरपालसिंग (Harpal Singh) हे नाव त्यात प्राधान्यानं घेतलं जातं. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. हरपालसिंग हे मारुती 800 (Maruti 800) ही चारचाकी खरेदी करणारे कंपनीचे पहिले ग्राहक होते. त्याविषयीची माहिती नवभारत टाइम्सनं दिली आहे.
मारुती 800 विषयी बोलताना तिचा रंजक इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ही कथा सुमारे 4 दशकांपूर्वी म्हणजेच 1980 मध्ये सुरू होते. तो काळ भारतात उदारीकरणाच्या सुरुवातीचा काळ होता. या कालावधीत संजय गांधी (Sanjay Gandhi) हे एक महत्त्वाकांक्षी स्वप्न पाहत होते; मात्र दुर्दैवानं जून 1980मध्ये त्यांचं विमान अपघातात निधन झालं. मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्तात कार खरेदी करता येण्याचं त्यांचं स्वप्न हळूहळू साकार होऊ लागलं. अर्थात त्याला कारणीभूत ठरला मारुती उद्योग लिमिटेड (Maruti Ltd.) हा उद्योगसमूह. या समुहानं मारुती 800 नावानं सर्वांत स्वस्त कार लॉंच केली. ही कंपनी भारत सरकार आणि जपानची सुझुकी मोटर कंपनी यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आली.
मारुती सुझुकीनं 9 एप्रिल 1983 रोजी कारचं बुकिंग सुरू केलं. 8 जूनपर्यंत म्हणजेच केवळ 2 महिन्यांत 1.35 लाख कार्सचं बुकिंग झालं. आजच्या स्थितीनुसार हिशोब केला, तर हे बुकिंग खूपच मोठं होतं. कंपनीनं आपली पहिली कार मारुती 800 या नावानं बाजारात आणली. त्या वेळी तिची किंमत केवळ 52 हजार रुपये होती. कमी किंमत, चालवण्यास सोपी आणि चांगलं मायलेज यामुळे ती कार त्या काळी अन्य कार्सच्या तुलनेत अधिकच लोकप्रिय ठरली.
मारुती कंपनीने मारुती 800 ही कार जेव्हा बाजारात सादर केली, तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये या गाडीविषयी चर्चा सुरू झाली. त्या काळात केवळ दोन महिन्यांत 1.35 लाख कार्सचं बुकिंग झालं होतं. त्यामुळे अनेक ग्राहकांना गाडीसाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु, हरपालसिंग नशीबवान ठरले आणि पहिल्या गाडीची चावी घेण्याचा मान त्यांना मिळाला.
संजय गांधी यांच्या स्वप्नातली ही स्वस्त कार एवढी लोकप्रिय होईल, याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. बाजारात सुमारे 31 वर्षं या कारचं वर्चस्व राहिलं. आजही ही कार अनेक ग्राहकांची पहिली पसंती आहे; मात्र 2014 मध्ये मारुती 800 या कारचं उत्पादन बंद झालं.