Maharashtra HSC Result 2022: राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के, मुलींची बाजी; कोकण विभाग अव्वल!

0

दि.८: Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) निकाल जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे. 

राज्याच्या बारावीच्या बोर्डाची पत्रकार परिषद आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. राज्यात यंदा बारावीची परीक्षा कशी घेण्यात आली आणि किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? तसंच सरासरी निकाल किती लागला याची सविस्तर माहिती देण्यात आली. यंदा ७५ टक्के लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर किमान ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. तसंच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. तसंच ७० ते १०० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी यंदा ३० मिनिटं जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. तर ४० ते ६० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी १५ मिनिटं जादा वेळ देण्यात आला होता. शाळा तिथं परीक्षा केंद्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. बारावीच्या निकाल यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९५.३५ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९३.२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…
कोकण- ९७.२१ टक्के
पुणे- ९३.६१ टक्के
नागपूर- ९६.५२ टक्के 
औरंगाबाद- ९४.९७ टक्के
मुंबई- ९०.९१ टक्के 
कोल्हापूर-  ९५.०७ टक्के 
अमरावती- ९६.३४ टक्के
नाशिक- ९५.०३ टक्के 
लातूर- ९५.२५ टक्के  

असा पहा निकाल

विद्यार्थी आणि पालकांना http://hscresult.mkcl.org किंवा http://maharesult.nic.in किंवा http://msbshse.co.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येईल, त्याची प्रतही (पिंट्र आऊट ) घेता येईल. दुपारी १ वाजता या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here