लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल: राज ठाकरे

0

मुंबई,दि.17: आज (दि.17) हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आहे. या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं का बोललं जात नसेल? अर्थात रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं. त्यामुळं हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक ‘सजा’कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगरच्या महापालिकेत खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार. अर्थात लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे. मला नेहमी वाटतं की इतक्या मोठ्या लढ्याबाबत आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरची काही व्याख्यानं यूट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कुणाला माहित नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

माझं म्हणणं आहे की, आता जे नवं शिक्षण धोरण येत आहे. त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळं मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here