सोलापूर: अवैध धंद्यातील आर्थिक वादातून झालेल्या ‘अथर्व जाधव’ खून प्रकरणात मुख्य आरोपीला जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१४: अवैध व्यवसायातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून अथर्व जाधव या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला मुख्य आरोपी बाळू उर्फ औदुंबर प्रकाश काळे (रा. विजापूर रोड, सोलापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी हा आदेश दिला.

नेमकी घटना काय होती?

सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, अवैध व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीवरून आरोपी आणि त्याच्या भागीदारांमध्ये वाद होता. या वादातून ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी बाळू काळे आणि त्याच्या साथीदारांनी कट रचला.

• हल्ला: इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे असलेल्या ऑफिसमध्ये शस्त्रांसह प्रवेश केला.

• तोडफोड: हिशोबाच्या वह्या ताब्यात घेऊन ऑफिसमधील साहित्याची मोडतोड केली.

• हिंसाचार: तेथील कामगारांना मारहाण केली. यात अथर्व जाधव याला बांबू, कुऱ्हाड, कोयता आणि तलवारीने गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना अश्विनी सहकारी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

सोलापूर सत्र न्यायालयाने यापूर्वी बाळू काळेचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली.

न्यायालयातील युक्तिवाद

• बचाव पक्षाचा दावा: ॲड. माने यांनी युक्तिवाद केला की, आरोपीला या प्रकरणात खोट्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. तसेच, प्राथमिक नोंदीनुसार अथर्व जाधव याचा मृत्यू हा घातपातापेक्षा अपघाती असल्याचे दिसून येते.

• निकाल: बचाव पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. जयदीप माने यांनी, तर सरकार पक्षातर्फे ॲड. ए. एस. साळगावर यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here