Shivsena: ‘त्या’ ७ खुनांची फाइल पुन्हा उघडली जाणार?: शिवसेना-राणे वाद पुन्हा चिघळणार

0

मुंबई,दि.१९: Shivsena: केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करून गौप्यस्फोट केला होता. मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावरुन राणे कुटुंबाकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. स्वत: नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना (Shivsena) वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंवर गंभीर आरोप करून अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षांमध्ये अनेक गंभीर घटना घडल्या. मारामाऱ्या झाल्या. खंडणी उकळण्यात आली. गेल्या वर्षांत सिंधुदुर्गात झालेल्या राजकीय हत्यांप्रकरणात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटणार असून, त्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करू, असा इशाराच राऊत यांनी यावेळी दिला.

काही दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना विनायक राऊत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले होते. हा आरोप-प्रत्यारोपांचा ‘सिलसिला’ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज, शनिवारी शिवसेना खासदार विनायक राऊत, महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी राऊत यांनी पुन्हा राणेंवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप करतानाच, इशाराही दिला. राणे यांनी आमच्यावर आरोप केले. ते निराधार आहेत. पण त्यांच्या आरोपांची दखल घ्यावीशी वाटत नाही. राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, पण मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना आठवण नसेल, पण मला भूतकाळ सांगावा लागेल. सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षांत अनेक घटना घडल्या. मारामाऱ्या, खंडणी उकळण्यात आली. मंचेकर, गोवेकर, भिसे यांच्या निर्घृणपणे हत्या झाल्या. या हत्याच्या घटना कुणी पचवल्या, असा सवालही राऊत यांनी केला. सिंधुदुर्गात ज्या राजकीय हत्या झाल्या आहेत, त्याबाबत आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून, चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.

ईडीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असेल?

मातोश्रीवरील चार जणांविरोधात ईडीकडून नोटिसा तयार आहेत, असा इशारा राणे यांनी दिला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून धमकी देणे हे पदाचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. एकतर ईडीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असेल, किंवा ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरली असेल, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली. याबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार असून, पंतप्रधानांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी राऊत यांनी व्हिडिओही दाखवला. त्यात राणेंवर देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्यावर काय-काय आरोप केले होते, ते दाखवण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here