दि.28: गुजरातमधील बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेवरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुजरातमधील बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेवर शिवसेनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्ला चढवला. बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणे? ही हिंदू संस्कृती आहे का? असा थेट सवाल केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रोखठोक’ या सदरातून ही टीका करण्यात आली आहे. हे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेले नाही, तर कडकनाथ मुंबईकर यांनी लिहिले आहे. राऊत सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.
गुजरातमधील गोध्रा येथे 2002 च्या दंगलीत अयोध्येवरून परतणाऱ्या राम भक्तांच्या एका ट्रेनचे डबे जाळल्यानंतर झालेल्या दंगलीदरम्यान बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. याशिवाय तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. सामूहिक बलात्कार झाला तेव्हा बिल्किस बानो पाच महिन्यांची गर्भवती होती.
राज्य सरकारने गुजरात सरकारच्या माफी धोरणांतर्गत त्यांची सुटका करण्याची परवानगी दिल्यानंतर या प्रकरणातील 11 दोषींना 15 ऑगस्ट रोजी गोध्रा सब-जेलमधून सोडण्यात आले. ते 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. बाहेर आल्यानंतर त्यांचा सत्कार करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
‘सामना’मधील अग्रलेखात म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे म्हटले आहे. “बिल्किस बानो प्रकरणाने हा मुद्दा खरा असल्याचे सिद्ध केले आहे,” असे पवार म्हणाले.
बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणे ही हिंदू संस्कृती आहे का? असा सवाल शिवसेनेने केला आहे. केवळ बिल्किस बानो मुस्लिम आहे, म्हणून तिच्यासोबत झालेला गुन्हा माफ होऊ शकत नाही. पुढे लिहलंय की “हा हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही, तर हिंदुत्वाचा आत्मा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठेचा आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरात दौरा करतील तेव्हा त्यांना (बिल्कीस बानो) भेटून पाठिंबा दिला पाहिजे. बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारने सोडलेल्या 11 दोषींच्या सुटकेला देशभरातील अनेक संघटनांनी विरोध केला आहे.
‘सामना’मध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात महिला सक्षमीकरणाबाबत बोलले असताना दोषींना सोडण्यात आले हे आश्चर्यकारक आहे. या लेखात प्रश्न विचारण्यात आला आहे की, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मुद्द्यावर गप्प का आहेत?