शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केला खळबळजनक दावा

उदय सामंत यांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

0

मुंबई,दि.१६: शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी १७ डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजपाच्या काही नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांवरून गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या या वक्तव्यांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून मुंबईत १७ डिसेंबर रोजी निषेध करण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. त्यासंदर्भात दावे-प्रतिदावे सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.

उदय सामंत यांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आपल्या वक्तव्यामध्ये उदय सामंत यांनी विशिष्ट एका पक्षाचा उल्लेख जरी केला नसला, तरी त्यांचा रोख ठाकरे गटाच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे उद्धव ठाकरे वेगवेगळ्या समाजघटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करून पक्षबांधणीसाठी काम करताना दिसत असताना दुसरीकडे उदय सामंत यांनी केलेल्या या विधानामुळे ठाकरे गटाच्या चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “१० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत.जरी सरकार पाडण्याच्या किंवा निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या, तरी मी असं सांगितलं होतं की १७० हा आमचा बहुमताचा आकडा आहे. आणखीन १० ते १२ लोक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो. नवीन वर्षांत तुम्हाला नव्या घडामोडी काय आहेत ते कळेल”, असा थेट दावा उदय सामंत यांनी केला आहे.

खरा धमाका पाच महिन्यांपूर्वी झाला

दरम्यान, “खरा धमाका पाच महिन्यांपूर्वी झाला. त्याचे पडसाद नवीन वर्षात उमटतील”, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. लांज्यामधील आख्खी नगरपंचायतच आमच्याकडे येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, आज नाशिकमधील ठाकरे गटाच्या ११ माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटासाठी या घडामोडी चिंता वाढवणाऱ्या ठरू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here