मुंबई,दि.6: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बेळगाव सीमाभागात (Belgaum Border) कन्नड रक्षण वेदिके संघटनेने मांडलेल्या उच्छादानंतर, शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar PC) घेऊन आज सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar PC on Border Dispute
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. हे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर महाराष्ट्राच्या संयमलाही मर्यादा आहेत. येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात होणारे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राने आतापर्यंत राखून ठेवलेल्या संयमाची जागा वेगळी गोष्ट घेऊ शकते. मग त्यानंतर जे काही होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. शरद पवार मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे: शरद पवार
“माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. पुढच्या 10 दिवसांत दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन होणारं आहे. आज भूमिका घेण्याची वेळ आली आहे त्यामुळं पत्रकार परिषद घेतली आहे”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
सीमाभागात किती गंभीर परिस्थिती आहे हे दिसून येत आहे: शरद पवार | Sharad Pawar On Maharashtra Karnatak Border
संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यांनी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाणा दिवशी आज काही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. या सगळ्या बाबीतून स्पष्ट होतं आहे की सीमाभागात किती गंभीर परिस्थिती आहे. सीमाभागात ज्या काही घटना घडतात त्यावेळी त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते माझ्या सातत्यानं संपर्कात असतात. आज जी माहिती आली आहे माझ्याकडे ती गंभीर आहे. तिथं गाड्या तपासणे, कार्यकर्त्यांची चौकशी करणे सुरू आहे. मराठी भाषिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतं आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल: शरद पवार
या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होत मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला.
मी लहान लोकांवर बोलणार नाही
यावेळी शरद पवारांना उत्पनादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत विचारण्यात आलं. शंभूराज देसाई म्हणाले होते, यामागे कर्नाटक सरकार आहे की नाही ते बघावं लागेल, थेट आरोप करुन चालणार नाही. त्यावर पवार म्हणाले, “मी लहान लोकांवर बोलणार नाही”.