दि.30: शरद पवार (Sharad Pawar) हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडीद्वारे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे असे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी म्हटले आहे. भाजपा केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग करत आहे, असे आरोप शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून अनेकवेळा करण्यात आले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत हे लवकरच आत जाणार म्हणून अनेकवेळा भाजपाकडून दावा करण्यात आला होता. आता भाजपाकडून राष्ट्रवादीचे नावे जाहीर केली जात आहेत.
यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा सक्रीय झाले असून, एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून पुढील रणनीतिला सुरुवात केली आहे. यातच रोहित पवार आणि राष्ट्रवादीतील काही नेते भाजपच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून भाजप नेत्याने शरद पवार कुटुंबार निशाणा साधला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी आढावा बैठक घेतली. यावेळी शरद पवार यांनी भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या. यानंतर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर पलटवार केला आहे.
संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. यावर जेवढी नावे त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सखोल चौकशीनंतरच पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पवार हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
रोहित पवारांवर होणाऱ्या आरोपांसंदर्भात बोलताना, रोहित पवारांचे काय होणार? याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजप नेते त्याआधीच असे होणार, तसे होणार, अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, यांच्या घरावर धाड पडणार, यांचे अमुक होणार, त्यांचे तमुक होणार, आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.