मुंबई,दि.23: शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराजे देसाई यांनी आम्ही आणखी काही गोष्टी उघडपनाने बोलू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आदेश दिले आहेत असे म्हणत शिवसेनेला इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना गडचिरोलीचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली असताना त्यांची सुरक्षा वाढवण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता, असा दावा करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार सुहास कांदे यांनी केला होता. सुहास कांदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुहास कांदे यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी देखील भाष्य केलं आहे. माऊवादी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकीचे पत्रही दिले, असं शंभूराजे देसाईंनी सांगितलं.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला मारण्याचा पत्रात उघड उल्लेख होता. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन वेळा सांगितले की, तुम्हाला त्यांची सुरक्षा वाढवता येणार नाही. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, असं शंभूराजे देसाईंनी सांगितले.
आम्हाला हिणवले तर आणखी स्फोट होतील. आमच्या मनात आणखी खूप काही आहे, असा इशारा देखील शंभूराजे देसाईंनी दिला. आणखी काही गोष्टी आहेत त्या आम्ही उघडपनाने बोलू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आदेश दिले आहेत. अडीच वर्षात खूप काही साठले आहे, असं शंभूराजे देसाईंनी सांगितले. आमच्या मनात साठवून ठेवायची काही मर्यादा आहेत. जर मर्यादा संपली, तर 50 आमदार आणि 12 खासदार यांच्या मनातल्या व्यथा साठलेले कटू अनुभव आम्हाला उघड करावे लागतील, असा इशारा देखील शंभूराजे देसाईंनी यावेळी दिला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता.
मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली. हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे, असे सुहास कांदे म्हणाले होते.