मुंबई,दि.20: School Reopen In Maharashtra: कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात 24 तारखेपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. School Reopen In Maharashtra
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ग्रामीण आणि शहरी भागात शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारपासून सुरू केली जावीत, असा प्रस्ताव राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. पालक, शिक्षक, संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याच्या मागणीचा रेटा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याची माहिती गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली. पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे.
हेही वाचा Viral: Live TV Debate दरम्यान बोलण्याची संधी मिळाली नाही, म्हणून महिला मध्येच उठली आणि लागली नाचू
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’24 जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.’ करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त आदींना तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. याच प्रस्तावात शाळा-महाविद्यालयातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेजांमध्येच लसीकरण करण्याची आणि ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लशीची दुसरी मात्रा बाकी आहे, त्यांना ती देण्याची शिफारस केली आहे,’ अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली.