Sanjay Raut: संजय राऊत यांचे मोदी शाह यांच्याबाबत सूचक विधान

Sanjay Raut At Nashik: उद्या मोदी-शाह सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर...

0

नाशिक,दि.15: Sanjay Raut At Nashik: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी शाह (Modi Shah) यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे. नरसिंहराव पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्याकडेही पोलीस गेले होते. इंदिरा गांधी (Indira Gandhi) पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांनाही अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. उद्या मोदी-शाह सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, अनेक अशी प्रकरणं आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे लोक जबाब घ्यायला जाऊ शकतात. तुमच्यापर्यंत लोकांनी पोहोचायचं नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट भाजपवर टीकास्त्र डागलं.

असा हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरेल? | Sanjay Raut At Nashik

संजय राऊत हे कालपासून नाशिक शहरात आहेत. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या ‘महाविकास आघाडी मला अटक करणार होती’ या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस अलीकडे बोलत आहेत की, ‘मला अटक करणार होते, मला अटक करणार होते’. कधीकाळी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, ते म्हणायचे की, आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो’, असा हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरेल? आम्ही घाबरलो का? आमच्यावर खोटे खटले दाखल केले. अनिल देशमुखांवर खोटे खटले दाखल केले. नवाब मलिक यांच्यावर देखील खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल केला.

तुमच्या पक्षातील चोर, लफंगे यांना तुम्ही क्लीन चिट देता | Sanjay Raut

संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकून देशभरात धाडी टाकल्या जात आहेत, तेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही की, आपल्या राजकीय सहकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीनं कारवाया करत आहोत. दुसऱ्या बाजूला तुमच्याच पक्षातील चोर, लफंगे यांना तुम्ही क्लीन चिट देता. विक्रांत घोटाळा, यात लोकांचे पैसे गोळा केलेत आणि अशा लोकांना तुम्ही क्लीनचीट देतात. बँकांना लुटणारे त्यांना तुम्ही क्लीन चिट देताय, अशी अनेक प्रकरणे आहेत. तपास पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही गुन्हे मागे कसे घेऊ शकतात? ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. मग स्वतःच्या संदर्भात काही प्रकरण आलं की, बोभाटा करायचा, देवेंद्र फडणवीस यांना कोणी अटक करणार नव्हतं, अशा प्रकारचं घाणेरडे कृत्य अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेलं नाही आणि आम्ही केलंही नसतं, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

मोदी-शहा सत्तेतून उतरल्यावर…

नरसिंहराव प्रधानमंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडेही गेले होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांनाही अटक करण्यासाठी लोक गेले होते. उद्या मोदी शाह सत्तेवरून उतरल्यानंतर अनेक अशी प्रकरण आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे लोक जबाब घ्यायला जाऊ शकतात. तुमच्यापर्यंत लोकांनी पोहोचायचं नाही का? कायद्याचं राज्य आहे ना, मग प्रत्येकाने कायद्यासमोर जायला हवं, आम्हीही गेलो, आम्ही रडत बसलो का? आम्ही काल लढलो, उद्या लढू, आणि लढत लढत राहू आणि याच लढाईतून आमचं सरकार महाराष्ट्रात येईल. हे तुम्ही लिहून घ्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तो संपूर्ण काळ त्यांच्या नैराश्याचा काळ होता. म्हणून मला एकदा अटक करा, मी प्रकाशात येईल, असा त्यांचा कांगावा होता. पोलीस त्यांच्या घरी गेले, आमच्यासारखं त्यांना बोलावलं नाही. घरी येऊन धाडी नाही टाकल्या, असेही संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे हे अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य मुख्यमंत्री होते

उद्धव ठाकरे हे अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य मुख्यमंत्री होते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याला कोणी अटक करतं का? तुमच्याकडे तुमचा जबाब घ्यायलाही जायचं नाही का, आमच्याकडे येतात. कारस्थानं करून यंत्रणांचा दबाव आणून, ईडी, सीबीआयचा वापर करून आमदार फोडण्यात आले. पैशाचा इतका बेफाम वापर महाराष्ट्राचा राजकारणात कधीच कोणी पाहिला नाही, प्रत्येक गोष्टीत फक्त माणसं विकत घ्यायची, ग्रामपंचायत सदस्यापासून नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी विकत घेण्यासाठी रेटकार्ड लावलेला आहे, गावागावात शहरात कमिशन एजंट नेमलेले आहेत. ते ठरवितात काय द्यायचं ते, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here