मुंबई,दि.29: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. गिरीश बापट यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता खुद्द अजित पवार यांनीच दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे असूनही पवार यांनी त्यावर राष्ट्रवादीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत हा जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. य़ाच दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल” असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांचे सूचक ट्विट
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “कसेल त्याची जमीन या प्रमाणे… जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
टिंबर मार्केट येथे गुरुवारी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी पोटनिवडणूक जाहीर होणार असल्याची माहिती असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आता लोकसभेची मुदत संपण्यात फक्त वर्षाचा कालावधी बाकी असल्याने पोटनिवडणूक घेणार नाहीत असे वाटत होते, मात्र आता मला अशी माहिती मिळाली आहे की पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.
सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की, पोटनिवडणूक किंवा निवडणूक प्रत्येक जागा विरोधकांनी जिंकायला हवी. त्यानुसार व्यूहरचना करावी लागेल. पुणे शहरात आमची राजकीय ताकद जास्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही ती दाखवली. आमचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक होते तर काँग्रेसचे फक्त १०. अशा स्थितीत ही जागा हातची का घालवायची? असा विचार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असे आमचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले. जिथे ज्यांची ताकद जास्त ती जागा त्यांनी लढवावी, असे साधे सूत्र आहे असेही ते म्हणाले.