मुंबई,दि.२४: Attack On Kirit Somaiya: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या हल्ल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) हे राणा दाम्पत्याला भेट देण्यासाठी खार पोलीस स्टेशनला निघाले. मात्र त्याठिकाणी असलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेक, बाटल्या फेकून जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, आयएनएस विक्रांतच्या निधीचा अपहार करणारा आरोपी बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? आयएनएस विक्रांत घोटाळा हा देशद्रोह आहे! जय महाराष्ट्र, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खार पोलीस ठाण्यात रवी राणा आणि नवनीत राणा यांना भेटण्यासाठी आलेले माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर काल रात्री हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटून त्यांना दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर जमले होते. यावेळी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.