मुंबई,दि.७: शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांच्यामुळेच अनेकांनी शिवसेना सोडली असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला. संजय राऊत शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत असेही शहाजी बापू पाटील म्हणाले. अनेक आमदारांनी यापूर्वीच संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. आमदार दीपक केसरकर यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचे केसरकर म्हणाले होते.
शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते नसून शरद पवारांचे (Sharad Pawar) आहेत असे म्हटले होते. त्यावर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शहाजी बापू पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
“शहाजी बापू पाटील आधी कुठं होते? ते आता शिवसेनेत आलेत. मी काय मोदीही शरद पवारांचं कौतुक करतात. शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं मोदी म्हणतात. मग मोदींना तुम्ही असंच म्हणणार का? ते काय झाडी, काय डोंगर ते सारं ठिक आहे. त्यापुढे किती खोकी असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शहाजी बापू पाटील यांनी केली होती टीका
सांगोलच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांच्यावर टीका केली. “संजय राऊत रोज सकाळी उठतात आणि कचाकचा बोलतात. आग लावून देतोत. त्यांना आधी कुलूप लावून बंद करा. आम्ही घरातून बाहेर पडलो की सकाळसकाळ आमच्या डोक्याला टेन्शन येतं. सारखं टीव्हीवर येऊन पवार साहेब जागतिक नेते, पवार साहेब आमचे नेते असं कौतुक करत असतात मग त्यांनी तिथंच जावं की. शिवसेनेचे प्रवक्ते आहात तर उद्धव साहेबांबद्दल बोला की. नाहीतर आम्हाला आमच्या साहेबांबद्दल बोलू द्या”, असं शहाजी बापू म्हणाले होते.