निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे: संजय राऊत

कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान करणे योग्य नाही

0

मुंबई,दि.१९: निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रणजीत सावरकर यांना केले आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना त्यांनी सावरकर यांच्यावर वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यात गदारोळ माजला आहे. भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

‘कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांना वाद न वाढवण्याची विनंती केली.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला आहे. भाजपने आता नेहरू यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी रणजीत सावरकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे कुठल्या एका पक्षाचे नाही. देश उभारण्यासाठी त्यांनी त्याग केलं आहे. जी लोक जिवंत नाही, त्यांच्याविरोधात वाटेल ती विधानं केली नाही पाहिजे’ असा टोला राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.

‘पंडीत नेहरू यांनी देशासाठी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अश्फाक उला खान, मौलाना आझाद, लाल बहादूर शास्त्री, वीर सावरकर यांचं देशासाठी योगदान आहे. कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत. इथं त्यांच्यासाठी लढा देत आहे’ असं म्हणत राऊत यांनी रणजीत सावरकर यांची समजूत काढली.

‘देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाचा वाटेवर नेण्यात पंडीत नेहरू यांचं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर नेहरू यांनी देशाला विज्ञानाच्या दिशेनं नेण्याचं काम केलं. नाहीतर या देशाचा पाकिस्तान होण्यासाठी वेळ लागली नसती. आज पाकिस्तानची धर्मांध अशी ओळख झाली आहे. पण नेहरूंनी देशाला अशा वाटेवर जाऊ दिलं नाही. या बद्दल देश नेहरू यांचा ऋणी आहे’ असंही राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here