Samriddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात प्रवासी बसने पेट घेतल्याने २५ जण मृत्यूमुखी

0

सिंदखेड राजा,दि.१: Samriddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात? | Samriddhi Mahamarg Accident

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.

बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले अशीही माहिती मिळते आहे.

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले आहे. बसने पेट घेतल्याने मृतदेह होरपळले आहेत. त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे अशीही माहिती समोर आली आहे.

नागपूर येथून या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची यादी मागविण्यात आली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. मात्र मृतकांची अेाळख पटविण्यासाठी डीएनए टेस्टशिवाय पर्याय नसल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ही बस वातानुकुलीत असल्याने अपघातानंतर बसचा दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे. बसचा चालक व क्लिनर अपघातानंतर बसचा काच फुटल्याने कसेबसे बाहेर पडू शकले होते. त्यांनीच १०८ रुग्णवाहिकेस फोन केल्यानंतर अपघाताची माहिती मिळाली असल्याची बाब समोर आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here