दि.२८: वडील शाहू छत्रपती (Chhtrapati Shahu Maharaj) यांच्या वक्तव्याबद्दल संभाजीराजेंनी (Yuvraj Sambhaji Raje) ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती (Chhtrapati Shahu Maharaj) यांनी संभाजीराजेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. संभाजीराजेंनी (Yuvraj Sambhaji Raje) २०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठीही आमचा विरोध होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतरची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक जगण्याचा अधिकार आहे. मला किंवा छत्रपती घराण्याला कुठलाही निर्णय विचारून घेतला नाही. मी कधीही त्यांना विरोध केला नाही. आतापर्यंत जे निर्णय घेतले ते व्यक्तिगत आहेत. राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचं असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. पक्ष स्थापन केला असेल तर त्यांना राजकारण जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना खासदारकी हवी होती असं शाहू छत्रपती यांनी सांगितले.
शाहू छत्रपती म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असं मत मांडले होते. परंतु त्यांनी वैयक्तिक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे विधान केले.
त्याचसोबत संजय पवार यांचे शिवसेनेकडून नाव जाहीर होताच स्वत: छत्रपती शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, जो अनेक वर्ष पक्षासाठी झटत होते त्यांना संधी देण्याचं काम शिवसेनेने केले त्याचा आनंद असल्याचं मत छत्रपती शाहूंनी व्यक्त केलं. तसेच शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असंही म्हणता येत नाही असं त्यांनी म्हटलं.
शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे त्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात वडिलांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यावर सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे.
दरम्यान, यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झालेली असतानाच संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही”, असं संभाजीराजे छत्रपती आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
संभाजीराजेंनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उमेदवारीबाबत दिलेला शब्द मोडल्याची टीका केली होती. तसेच, आता आपण राज्यसभा उमेदवारी लढवणार नसल्याचं देखील जाहीर केलं होतं. संभाजीराजेंना पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापुरातल्याच संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या घटनाक्रमावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.