मुंबई,दि.२७: शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच असे ट्विट करत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यातून निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यभरातून अनेकांनी या वक्तव्याविरुद्ध आंदोलन केले. तसेच संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून आणि भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांवर अजूनही कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आज पुन्हा संभाजीराजेंनी ट्विट करत इशारा दिला आहे.
सदर प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.’

छत्रपती उदयनराजे यांचा इशारा
भगतसिंग कोश्यारी यांना आता विस्मरण झालं असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. भगतसिंग कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन, असा इशारा उदयनराजे यांनी दिला. राज्यातील प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय समाजकार्यासह राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. देशाला एकत्रित ठेवायचे असेल, तर छत्रपतींचे विचार जपावे लागतील; अन्यथा भविष्यात देशाचे तुकडे होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला हटविणे, सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, असं म्हणत राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांना इशारा दिला आहे.
भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?
‘आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,’ असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.