कधी काळी काँग्रेसलाही वाटत होते की, देशात फक्त आम्हीच राहू, पण आज काय स्थिती आहे?

0

दि.४: “नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे. भारत हा सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे व मोदी पंतप्रधान आहेत. ते लोकशाही मार्गाने निवडून आले. लोकांचा पाठिंबा मिळाला तर त्यांनी पुन्हा निवडून यावे, पण आम्हीच निवडून येऊ व आमच्यासमोर विरोधी पक्षच शिल्लक ठेवणार नाही, ही भाषा लोकशाहीस मारक आहे. देशात सत्तेवर कोणी राहायचे हे लोकांनी ठरवायचे. कधी काळी काँग्रेसलाही वाटत होते की, देशात फक्त आम्हीच राहू, पण आज काय स्थिती आहे?” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला काँग्रेसचं उदाहरण दिलंय.

गुजरातमधील दंगलीनंतर मोदींच्या पाठीशी केवळ शिवसेनाप्रमुख होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवण्यास निघालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? असा प्रश्न शिवसेनेनं विचारालाय. देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजपा टिकेल, असा दावा नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून यावरुनच आता शिवसेनेनं भाजपा आणि नड्डा यांना लक्ष्य केलं आहे.

भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार, असे जे पी नड्डा यांनी म्हटले होते. नड्डा यांच्या या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. त्यांनी शिवसेना संपवूनच दाखवावी, असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिले. त्यानंतर, आता सामनातून शिवसेनेनं नड्डा यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. तसेच, कावळ्याच्या शापाने गाय मरण नसते, असा टोलाही नड्डा यांना लगावला आहे.

भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. आता, नड्डा यांच्या भाषेत अहंकार आल्याचे सांगत शिवसेनेनं त्यांचा मुखपत्रातून समाचार घेतला आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे , असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण, त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नड्डा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

“भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. “नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपाच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात,” अशी आठवण शिवसेनेनं नड्डा यांना करुन दिलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here