मुंबई,दि.3: शिवसेनेकडून बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही!, या शब्दांत शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
राज्यातील वेगवगेळ्या भागांचे दौरे करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक गटावर शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे ईडीच्या भीतीने भाजपासोबत गेल्याचा दावा करतानाच शिवसेनेनं “मुख्यमंत्री हे विचित्र मनुष्यप्राणी आहेत,” असंही म्हटलंय. रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुनही शिवसेनेनं शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे नेमके कोणते विचार शिंदे गट पुढे नेत आहे असा प्रश्न विचारताना राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाने मवाळ भूमिका घेतल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.
“मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले आहे. अर्थात महाराष्ट्राला कळत असले तरी भाजपास वळायला वेळ लागेल हे मात्र खरेच. अशा या मुख्यमंत्र्यांनी एक महाराष्ट्र दौरा काढला व त्यांच्या समर्थक आमदारांच्या भागात ते तुताऱ्या फुंकून आले. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने गमतीची आहेत. त्यांच्या तोंडी क्रांती, उठाव असे शब्द येऊ लागले आहेत,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखातून शिंदे यांच्यावर टीका केलीय.
“संभाजीनगरच्या मुक्कामी मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांना ४० आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
शिवसेनेनं शिंदे हे स्वत: ईडीला घाबरुन भाजपासोबत गेल्याचंही म्हटलंय. “स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे. शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाड्या ‘ईडी’ने आवळल्यावरच त्यांनी सध्याचा उठाव आणि ‘क्रांती’ केली हेच सत्य आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला. शिंदे संभाजीनगरात म्हणाले, ‘राज्यात आम्ही नवीन सरकार बनवले आहे.’ शिंदे हे कोणत्या सरकारच्या बाबतीत बोलत आहेत? राज्यात शिंदे-फडणवीसांनी फक्त शपथ घेतली. त्याला एक महिना उलटूनही अद्याप सरकारचा पाळणा हललेला नाही. शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार असे कोणाला वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ‘ना घर का ना घाट का’ अशीच या लोकांची अवस्था झाली आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.