नवी दिल्ली,दि.25: RSS On Russia Ukraine War: युक्रेनवर रशियाच्या (Russia Ukraine War) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमधील हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, मतभेद संवादातून सोडवता येतात. संभाषणादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित अलीकडच्या घडामोडींची माहिती दिली.
युद्ध परिस्थितीवर भाष्य करताना भारताची भूमिका काय आहे, भारताने काय भूमिका घ्यायला हवी हेही अनेक ठिकाणी चर्चिले जात आहे. सद्यस्थितीत भारताने तटस्थ भूमिका घेतली असून तेथे फसलेल्या 20 हजार भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर, देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही यासाठी दबाव आणण्यात येत आहे. मात्र, हे युद्ध थांबले पाहिजे, अशीच भूमिका सर्वस्वी दिसून येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनीही सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर मत मांडलं आहे. भारताचा मित्र असलेल्या रशियावर भारताने दबाव टाकायला हवा, अशी भूमिका आरएसएसचे सचिव कुमार यांनी घेतली. तसेच, युक्रेनविरुद्ध होत असलेल्या सैन्य दलाच्या कारवाईला तात्काळ थांबविण्यात यावे, त्यासाठी भारताने इतर देशांसोबत हातमिळवणी करत रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन याच्यावर दबाव आणला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.
भारतासह जगभरातील सर्वच देशांच्या सरकारने, राजकीय विशेषज्ञांनी, सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांनी, नागरिकांनी, समाजसुधारकांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. या चर्चेतूनच हे सुरू असलेलं युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, व्लादीमीर पुतीन यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. भारत शांतताप्रिय देश आहे. युद्धाला प्रोत्साहन देईल, अशी कुठलिही परिस्थिती निर्माण होता कामा नये. युद्धाचे परिणाम अतिशय भयानक, असहनीय आणि पिडा देणारे असतात, असेही वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी म्हटले.