नवी दिल्ली,दि.26:Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमधील (Russia Ukraine War) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले. मात्र, भारताने (India) या मतदानातून स्वतःला वगळले. सर्व सदस्य देशांनी मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करावेत, असे भारताने म्हटले आहे. संवाद हाच वाद मिटवण्याचा मार्ग आहे. तथापि, या टप्प्यावर ते त्रासदायक वाटू शकते. संवादाचा मार्ग सोडला गेला ही खेदाची बाब आहे. आपण त्याकडे परत यावे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती (T S Tirumurti) यांनी सांगितले की, या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावापासून अलिप्त राहणे पसंत केले आहे.
टी एस तिरुमूर्ती मतदानावर भारताच्या बाजूने बोलतांना म्हणाले, “युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडींमुळे भारत खूप व्यथित आहे. आम्ही आवाहन करतो की हिंसा आणि शत्रुत्व त्वरित संपवण्यासाठी सर्व प्रयत्न झाले पाहिजेत. शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या ठरावाच्या बाजूने 11 मते पडली. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती मतदानापासून दूर राहिले. हा ठराव सुरक्षा परिषदेत संमत होऊ शकला नाही कारण कौन्सिलचे स्थायी सदस्य रशियाने त्यावर विटो केले होते.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी शुक्रवारी सांगितले की, रशियाला शेजारच्या युक्रेन काबीज करायचे नाही आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आवाहनावर युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे ठेवल्यानंतर मॉस्को युक्रेनशी चर्चेसाठी तयार आहे. रशियाने युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील दोन क्षेत्रे स्वतंत्र घोषित केल्याच्या निषेधार्थ अमेरिकेने अनेक निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या शहरांवर रशियन क्षेपणास्त्रांचा जोरदार हल्ला होत असून रशियाने युक्रेनचे एअरबेस आणि महत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.