नवी दिल्ली,दि.30: ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही (NDTV) इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. (Ravish Kumar Resigns From NDTV) एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय (Prannoy Roy) आणि राधिका रॉय (Radhika Roy) यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधून प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच आता एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
रवीश कुमार यांचे प्राइम टाइम, रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात हे टेलिव्हिजन न्यूज शो प्रसिद्ध आहेत. रवीश कुमार हे गेल्या दोन दशकांपासून एनडीटीव्हीशी संलग्न आहेत. त्यांना पत्रकारितेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.

रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याची माहिती, ‘एनडीटीव्ही’कडून बुधवारी एका ईमेलद्वारे जाहीर करण्यात आली. रवीश कुमार यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत हे यशाचं शिखर गाठलं आहे. 1996 पासून ते ‘एनडीव्हीशी’ जोडले गेले होते. समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती यांची अचूक नस पकडून सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. ‘रवीश की रिपोर्ट,’ ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने ‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातून रवीश कुमार मांडायचे. त्यानिमित्त रवीश कुमार यांना सर्वोच्च ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
रवीश कुमार यांना जेव्हा 2019 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता तेव्हा मॅगसेसेच्या वेबसाइटने म्हटलं होतं की “गेल्या काही वर्षांत भारतामध्ये स्वतंत्र पत्रकारितेचं अवकाश कमी होत चाललं आहे.”
मॅगसेसेनी म्हटलंय “रवीश कुमार हे सामाजिक मुद्द्यांना उचलून तथ्यांसहित, वस्तूनिष्ठपणे सभ्य शब्दांत आपले विचार आपल्या शोमधून मांडतात.”
“रवीश हे आपल्या न्यूजरुमला जनतेची न्यूजरूम संबोधतात आणि ते सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधतात.”
“जर तुम्ही जनतेचा आवाज झाला तर तुम्ही पत्रकार आहात अशी व्याख्या रवीश कुमार करतात आहे,”असं वर्णन मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावर आहे.