मुंबई, दि.10: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी प्रत्यक्ष मतदानाला (Rajya Sabha Election Voting) सुरुवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही आपल्या निवडणूक स्ट्रॅटेजीत बदल केला आहे. आपल्या पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या दोन मतांचा कोटा वाढवला आहे. यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं टेन्शन वाढलं आहे.
खबरदारी म्हणून आणि धोका नको म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतांचा कोटा वाढवला आहे. काँग्रेस आपली सर्वच्या सर्व म्हणजे 44 मते ही आपले उमेदवार इमरान प्रतापगढी यांना देणार आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन-दोन मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मते कमी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला किमान आपल्या उमेदवाराला 44 किंवा 45 मते मिळावीत, तर काँग्रेस आपल्या पहिल्या पसंतीची सगळी मतं आपल्या उमेदवाराला देण्याच्या बाजूने, पण शिवसेना केवळ 42 मतांच्या बाजूने आहे. कारण 44 मतं मिळाली तर शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला विजय मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव नाराज आहेत. त्यात आता काँग्रेसच्या या स्ट्रॅटेजी मुळे शिवसेनेच्या उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला. 42 ऐवजी कोटा बदलून 44 केला आणि त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
मतांचा कोटा 42 वरुन 44 इतका झाल्यास त्याच फटका शिवसेना उमेदवाराला बसेल आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळेच शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
विजयी होण्यासाठी आता 41 मते आवश्यक आहेत आणि त्यानंतर अतिरिक्त तीन मते आहेत ती दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला मिळतील. त्यामुळे स्वाभाविकच दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे ही मते ट्रान्सफर होतील. याचा परिणाम थेट होणार नाही. मात्र, दुसऱ्या फेरीत निवडून येण्याची शक्यता आहे.