मुंबई,दि.19: Raj Thackeray: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) जयंती जगभरात साजरी होते. विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. आज मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे. शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते.
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंती ही तिथीने साजरी का व्हावी, यामागील कारण स्पष्ट केले. आज महाराष्ट्रात तारखेनुसार शिवजयंती साजरी होतेय, ही चांगली गोष्ट आहे. पण तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला महाराष्ट्रात यापेक्षा मोठा उत्सव साजरा झाला पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीत दिवाळी, गणेशोत्सव यासारखे सण तिथीनुसार साजरे होतात. त्यामुळे प्रत्येकवर्षी ठराविक तारखेला हे सण येत नाहीत. शिवजयंती हा देखील महाराष्ट्रातील जनतेसाठी उत्सव आहे. त्यामुळे शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
तत्पूर्वी राज ठाकरे यांनी कुर्ला परिसरातील साकीनाका भागातील मनसेच्या शाखेचेही उद्घाटन केले. यावेळीही राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने पूर्ण ताकदीने रिंगणात उतरायचे ठरवले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे मुंबईत फिरून मनसैनिकांचा हुरूप वाढवताना दिसत आहेत.