सोलापूर,दि.13: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गंभीर विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाच्या विषयाकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढल आहे. या मुलांना पळवून त्यांच्यासोबत गैरव्यवहार केले जातात. यासंदर्भात प्रत्येक महिन्याला तक्रारी नोंदवल्या जातात. ही मोठी गंभीर बाब आहे.
हेही वाचा ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी विधानभवनावर मोर्चा
अहवालानुसार, जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतून 370 हून अधिक तरुण-तरुणी बेपत्ता झाल्या. यात 268 मुली आहेत. या गंभीर प्रकरणावर प्रश्न उपस्थित करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 या काळात मुलं पळवणाऱ्या आंतरराज्य टोळ्या 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसयांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे राज यांनी मुख्यमंत्र्यांचे एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर लक्ष वेधले आहे. अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा घडवून आणावी आणि काहीतरी ठोस कृती करावी अशी महाराष्ट्रातील जनतेची तुमच्याकडून अपेक्षा आहे असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मुलं पळवणाऱ्या टोळ्य़ांचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी X वर पत्र लिहित या गंभीर प्रकरणावर ठोस कृती करण्याची मागणी केली आहे. एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30 टक्क्यांनी नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबईच्या रस्त्यांवर दिसणाऱ्या लहान मुलांबाबत राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमधून व्यक्त केली आहे.







