Raj Thackeray Gudi Padwa Melava | शिवसेनेचं धनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून कुणालाच पेलवणार नाही माहित होतं: राज ठाकरे

0

मुंबई,दि.२२: Raj Thackeray Gudi Padwa Melava: जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो.. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. बऱ्याच काळानंतर बोलतो आहे. अनेकांनी काल विचारलं एवढे मोठे स्क्रिन कशासाठी लावले आहेत? म्हटलं भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहेत. काहीतरी उद्देश आहे म्हणूनच लावलेत ना? आज शिवतीर्थाचा कोपरा अन् कोपरा भरलेला दिसतो आहे. अनेकजण बोलले की हा संपलेला पक्ष आहे जरा बघा हा संपलेला पक्ष आहे का? जे बोलले त्यांची अवस्था काय झाली? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाचा वाद सुरू असताना | Raj Thackeray Gudi Padwa Melava

गेल्या दोन वर्षांपासून आपण महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा खेळ, बट्याबोळ सर्वच पाहतो आहे. हे सगळं राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होतं पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं की तुझं की माझं तेव्हा वेदना होत होत्या. लहानपणापासून मी तो पक्ष पाहात आलो, तो पक्ष जगलो. मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या शर्टवर वाघ असायचा.

मी राजकारण लहान असल्यापासून पाहात आलो. अनुभवत आलो. असंख्य लोकांनी शिवसेना उभी केली, अनेक लोकांच्या कष्टातून संघटना उभी केली. मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो आणि त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटलं होतं की हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. खड्ड्यात पक्ष घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी पक्ष सोडतोय. आजची ही परिस्थिती पाहिल्यावर टेलिव्हिजन सीरिज असतात त्यात रिकॅप येतो. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला. मात्र त्या भाषणात काय झालं कशामुळे झालं तो चिखल करायचा नव्हता आजही करायाचा नाही. मात्र काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेला शिवसेनापक्षप्रमुख पद हवं होतं. राजला मिळालं नाही म्हणून तो बाहेर पडला. माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता.

शिवसेनेचं धनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून कुणालाच पेलवणार नाही माहित होतं

शिवसेनेचं धनुष्यबाण हे शिवधनुष्य होतं. ते बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही मला माहित होतं. एकाला झेपलं नाही दुसऱ्याला बघा आता झेपतं आहे का? आत्ताच त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगतो माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका कारण नंतर मी जे काही बोलेन त्यामुळे तोंड लपवावं लागेल. सगळ्यांना तो महाबळेश्वरचा प्रसंग आठवतो. पण त्याआधीही अनेक गोष्टी घडल्या. हे मी सांगतोय कारण आत्ताची परिस्थिती तुम्हाला समजेल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मी पक्षातून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न झाले: राज ठाकरे

मी एके दिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलो. मी हे जे सांगतोय ते शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस. मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही. मी विचारलं ठरलं ना?तो म्हणाला हो ठरलं. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं त्यांना सांगितलं की सगळी समस्या सोडवली. आमच्या दोघांमध्ये आता काही वाद नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मला मिठी मारली आणि म्हणाले उद्धवला बोलव. पाच मिनिटं तो आला नाही. बाळासाहेबांनी मला सांगितलं उद्धवला बोलव मी त्याला बोलावयाला गेलो तो तिथून निघून गेला होता. मला कारण नसताना त्रास दिला जात होता. मी बाहेर कसा पडेन यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या.

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडलेच नसते: राज ठाकरे

नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली नसती. मी तुम्हाला प्रसंग सांगतो. राणे पक्ष सोडणार कळत होतं मी त्यांना फोन केला. ते म्हणाले जायचं नाही. मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांशी बोलतो त्यावेळी बाळासाहेबांना फोन केला ते मला म्हणाले की नारायण राणेला घेऊन ये. पाच मिनिटांनी फोन आला की नको आणूस मला तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं. मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका. मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. लोकांनी बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. जी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली त्याचा शेवट हा असा झाला. मला त्यांच्या राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आज बाळासाहेब ठाकरे असते तर…

अनेक गोष्टी तेव्हा झाल्या.. राजकारणात झाल्या. घरातून झाल्या. आज जर माननीय बाळासाहेब असते तर मागची दोन-अडीच वर्षे झालं ते होऊ दिलं असतं का? सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं याने हे केलं त्याने ते केलं. अरे तू का शेण खाल्लं? अडीच वर्षांपूर्वीची स्थिती आठवा. भाजपा आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. मतदानाचा अधिकार तुमचा आहे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सगळ्या लोकांनी मतदान केल्यानंतर हे यांचा खेळ खेळत बसणार? निवडणूक संपल्यावर निकाल आले तेव्हा एकत्र निवडणूक लढवून, उद्धव ठाकरेने सांगितलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं होतं. निवडणुकीत बोलला होतात? मला चार भिंतीत अमित शाह यांनी सांगितलं मग जाहीर का नाही केलं?

एकनाथ शिंदे यांना एकच सांगणं आहे…

अलीबाबा आणि चाळीसजण जूनमध्ये गेले. त्यांना चोर म्हणणार नाही कारण ते चोर नाहीत. यांनाच कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. कोव्हिडच्या काळात उद्धव कुणाला भेटायला तयार नव्हता. एक आमदार भेटायला गेला मुलाला घेऊन तर मुलाला बाहेर ठेवलं आणि आमदाराला भेट दिली. हे असं वागल्यावर २१ जूनला कळलं आपल्याला एकनाथ शिंदे सुरतला गेले. मग पुढे गुवाहाटीला गेले. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच. मग गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. एकनाथ शिंदेंना एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका. पेन्शनचा विषय अडकला आहे तो विषय मिटवा, शेतकऱ्यांचे विषय आहेत ते सगळे हातात घ्या. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भेटा सभा कशाला घेता? असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आत्ताच विधानसभेच्या निवडणुका घ्या…

आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. ज्या देशाने महाराष्ट्राचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली. हिंद प्रांतावर कुणी राज्य केलं असेल तर मराठेशाहीने तो हा महाराष्ट्र आहे. तो आज चाचपडतोय, आज हे गेले, उद्या ते गेले, उद्या ते आले. कशाप्रकारचं राजकारण आज महाराष्ट्र बघतोय? नवे उद्योग येताना दिसत नाहीत. बेरोजगारी आ वासून उभी आहे. बेरोजगार, तरूण हे सरकारकडे बघतं आहे. सरकार कोर्टाकडे बघतं आहे. असं कोर्टाकडे पाहून सरकार चालत नाही. मला तर म्हणायचं आहे की आत्ताच विधानसभा निवडणुका लावा जे व्हायचं ते होऊन जाऊदेत. मुख्यमंत्री नवीन आहेत. करा नीट काम एवढंच माझं सांगणं आहे.

मशिदींवरचे भोंगे सरकारने बंद करावेत नाहीतर…

सांगलीतल्या खेळाच्या मैदानावर कसं अतिक्रमण आहे त्याबद्दलचं पत्रच राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. अफझल खानाची कबर आणि त्याभोवतीचं अतिक्रमण मुख्यमंत्र्यांनी हटवलं. आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो तुम्हाला शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्ह मिळालं आहे. गेल्या वर्षी भोंग्यांचं आंदोलन झालं त्यावेळी मनसेच्या १७ हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्या. आता मशिदींवरचे भोंगे परत वाजू लागले आहेत. एक तर तुम्ही ते बंद करा किंवा मग आम्ही काय करतो आहे त्याकडे दुर्लक्ष करा आम्ही आमच्या पद्धतीने हे भोंगे बंद करू. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच सांगलीतल्या या गोष्टीकडे लक्ष द्या असंही राज ठाकरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here