मुंबई,दि.1: हिवाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस (Rainfall in maharashtra) कोसळला आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत जोरदार पाऊस कोसळत असल्यानं शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिकांची देखील धांदल उडत आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य- उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच आज पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
संबंधित जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारा वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रात पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांसोबत मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण-पूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भागात तीव्र पावसाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. पण उद्यापासून मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पण हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही.