“एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं” आमदार प्रसाद लाड

0

मुंबई,दि.१५: एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. जालन्यातील आंरतवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या सभेत मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी फडणवीसांना समज द्यावी. कारण, ते छोटे कार्यकर्ते अंगावर घालत आहेत, असं जरांगे-पाटील म्हणाले. याला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बोलवता धनी, तुमच्याकडून काम करून घेत आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहात, हे न शोभणारं कृत्य आहे, अशा शब्दांत लाड यांनी जरांगे-पाटलांना खडसावलं आहे.

“मराठा आरक्षणावरून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजानं याचा विचार करण्याची गरज आहे. मराठा आंदोलनात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. २०१८ साली देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलं. पण, उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्षे पाठपुरावा करण्यात आला नाही. त्यामुळे आरक्षण रद्द झालं,” असा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण…

“जरांगे-पाटील समाजासाठी काम करतात हे मान्य आहे. पण, ज्या पद्धतीनं तुम्हाला चालवलं जातंय, त्याचा निषेध करतो. जरांगे-पाटलांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे. पण, आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण १०० टक्के हवं आहे. गर्दी मराठा समाजाला नवीन नाही. ५० हून अधिक मोर्चे काढल्यानंतरही मराठा समाजानं गर्दी केली होती. या समाजाच्या भावना आहेत. ही कुठल्याही नेतृत्वाच्या मागची गर्दी नाही. तर मराठा आरक्षणासाठीची गर्दी आहे,” असं प्रसाद लाड म्हणाले.

“बोलवता धनी, तुमच्याकडून काम करून घेत आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहात, हे न शोभणारं कृत्य आहे. शरद पवार ४ वेळा, विलासराव देशमुख ९ वर्षे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब भोसले यांनी एवढे वर्षे मुख्यमंत्रीपद भूषावलं. पण, १९८३ साली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली आणि स्वत:चा देह त्यागला. त्यानंतही मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here