दि.२०: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत महत्त्वाचं विधान केलंय. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचं सांगितलं. तसेच समीर वानखेडे यांना काय होईल (कारवाई) असं वाटत नाही असं देखील आंबेडकर म्हणाले आहेत.
समीर वानखेडे यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर वडिलांनी स्विकारलेला मुस्लीम धर्म न स्विकारता वडिलोपार्जित आजोबांचा हिंदू धर्म स्विकारल्याचं जाहीर केलं, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर सांगतात की, समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला आणि नंतर समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वयात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित आजी -आजोबांच्या धर्माचा असल्याचं जाहीर केलं. यांसदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्व लोकांच्या माहितीसाठी मी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल वाचून दाखवतो.
सिव्हिल नंबर ७०६५/२००८ हा निकाल २६ फेब्रुवारी २००५ रोजी न्या. दीपक मिश्रा आणि गौवडा जी यांनी दिला आहे. सामान्यतः आई वडिलांचा धर्म लावला जातो. आई वडिलांचा धर्म वंशपरंपरा म्हणून लागतो. कोर्टाच्याच निर्णयामध्ये त्यांनी ज्याची चर्चा केल आहे. एक वंशपरंपरा निर्माण होते आणि दुसरी एक्झिस्टन्टमध्ये आहे. वयात आलेल्या मुलाला ती कुठली वंशपरंपरा तो स्वीकारणार हा त्याच्यावर महत्वाचं आहे आणि त्याने जर त्याच्या आजोबा – आजीची संस्कृती आणि परंपरा मान्य केली, तर हे गृहीत आहे. ते कुठेही बेकायदेशीर नाही.
तो १८ वर्षापर्यंत आई -वडिलांच्या ताब्यात असतो. तेव्हा आई – वडिलांनी लिहिलेलं आहे ते ग्राह्य धरावे असे नाही. तो जे करतो ते ग्राह्य आहे. म्हणून कोणाशी लग्न करत असताना तिच्या धर्माप्रमाणे झालं हा एक भाग आहे तर दुसरा भाग असा आहे, त्यांनी विशेष विवाह कायद्याप्रमाणे सुद्धा लग्न केलेलं आहे. त्यात त्यांचा हेतू महत्वाचा आहे, त्यांच्या बायकोचा हेतू महत्वाचा नाही.त्यांनी दाखवलेलं आहे मी माझ्या आजी – आजोबांच्या वंशपरंपरेशी जुळतोय आणि आई – वडिलांच्या जे काही नवी करायला मागतायेत त्याच्याशी मी फारकत घेत आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना काय होईल असं मला वाटत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली आहे.
“या प्रकरणात वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला परंतू मुलाने वडिलोपार्जित धर्म स्विकारला. त्यामुळे त्या मुलाने तो मादिगा आहे असं म्हटलं. तसेच त्याचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाचा निकाल मुलाच्या विरोधात लागला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुलाचं वडिलोपार्जित धर्माचं म्हणणं ग्राह्य धरलं. तसेच मुलाचं जात पडताळणी प्रमाणपत्र मान्य केलं,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.